Pankaja Munde : ‘विकासाचे फ्रेंड..’, माफ करण्याचा मोठेपणा असल्याचे म्हणत पंकजा मुंडेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
Pankaja Munde : ज्यांना स्वतःचा परिवार नाही म्हणून हिणवले गेले, त्यांनी या देशालाच आपला परिवार मानले - पंकजा मुंडे

Pankaja Munde : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. दिल्लीत आयोजित भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यानचा आपला अनुभव सांगणारा एक विशेष व्हिडीओ पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी मोदींच्या कार्याचे, नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी दोन ते तीन दिवस दिल्लीत होत्या. या बैठकीचा अनुभव त्यांनी सांगिला आहे. त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून विश्रांती न घेता थेट बैठकीला पोहोचले.
प्रवासाचा थकवा न जाणवू देता त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा स्थानिक प्रश्नांचा आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. ही बैठक तब्बल साडेआठ तास चालली आणि त्यात केवळ चहा-कॉफीसाठी अल्प विश्रांती घेण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा तरुणांनाही लाजवणारी
इतकेच काय तर, बैठकीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास होता. केवळ गरम पाणी पिऊन त्यांनी सलग साडेआठ तास प्रत्येक विषयावर सक्रिय सहभाग नोंदवला. उपवास असूनही त्यांच्या कामातील ऊर्जा, एकाग्रता आणि उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा ही तरुणांनाही लाजवणारी आहे. उपवास असतानाही फक्त गरम पाणी पिऊन ते प्रचंड ऊर्जेने काम करतात,” असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
देशाच्या विकासाचे आणि भवितव्याचे फ्रेंड
पंतप्रधान मोदींनी तरुणांना ‘फ्रेंड’ संबोधल्याचा उल्लेख करत पंकजा मुंडे म्हणाल्या, “ज्या दिवशी त्यांनी तरुणांना फ्रेंड म्हटले, त्या दिवशी प्रत्येकाच्या मनातील नकारात्मक भाव नाहीसा झाला. तुम्ही या देशाच्या विकासाचे आणि भविष्याचे फ्रेंड आहात. स्वतःला शिव्या देणाऱ्यांनाही माफ करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे आणि तोच त्यांना श्रेष्ठ बनवतो. ज्यांना स्वतःचा परिवार नाही म्हणून हिणवले गेले, त्यांनी या देशालाच आपला परिवार मानले आहे,” असे पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले.
तसेच उत्साहाने काम करणाऱ्या या नेत्याच्या जीवनातलं ध्येय या देशासाठीच आहे. त्या दिवशी निश्चित केलं की या ध्येयाला आपण खारीचा वाटा म्हणून जोडलं जायचं, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा:





