Ashadhi Wari 2025 : श्री तुकोबा आणि माऊलींच्या पालख्यांचे पुण्यात भक्तीमय स्वागत; भाविकांची रस्त्यावर दुतर्फा गर्दी !

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आज पुणे शहरात आगमन होत आहे. तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई पुणे रस्त्यामार्गे आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा संगमवाडीमार्गे पुण्यात येत आहे. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून पुणेकर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे.
आता तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वाकडेवाडी येथील दुपारचा विसावा घेऊन पाटील इस्टेटमार्गे पुण्यात येत आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा संगमवाडी येथे आता विसावा आहे. तुकोबांची पालखी मार्गस्थ झाल्यावर माऊलींची पालखी देखील पाटील इस्टेटमार्गे पुण्यात येईल.
दरम्यान, संगमवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.आगमनानंतर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल.
पुणेकरांचा उत्साह
आषाढी वारी हा पुण्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांनी तुकोबा आणि माऊलींच्या स्वागतासाठी उत्साह दाखवला आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि नागरिकांनी पालखी मार्गावर पाणी, अल्पोपहार आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे. “तुकोबा आणि माऊलींच्या दर्शनाने मनाला शांती मिळते. ही वारी आमच्या संस्कृतीचा आत्मा आहे,” असे भाव एका स्थानिक भाविकाने व्यक्त केले.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात सापडलेला 10 तोळे सोन्याचा गोफ केला परत
मुंबई येथील भाविक शैलेंद्र पाटील यांची 10 तोळे वजनाची सोन्याची चैन चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चैन खाली पडली. ही चैन आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना सापडली. त्यांच्यासोबत त्यांच्या नणंद सविता आहेर, धनश्री प्रगळे आणि मोहिनी वाघ या महिलाही उपस्थित होत्या.
कांचन यांनी तातडीने दिघी पोलीस ठाण्यात जाऊन चैन जमा केली. याचवेळी शैलेंद्र पाटील तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. हरवलेली चैन परत मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “माऊलींनीच कांचन यांच्या रूपात येऊन माझी चैन मिळवून दिली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





