नवी दिल्ली : दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या कारवाईत फक्त दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केली. त्यामध्ये एकाही नागरिकाला लक्ष केले नाही. ज्या ठिकाणी दहशतवादी स्थळ आहेत त्या सर्व ९ ठिकाणी भारतीय लष्कराने हल्ला केला. त्यामुळे हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, असा दावा डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी केला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तीनही सैन्य दलाची आज अधिकृतपणे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत तीन ते चार दिवसांत भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यावेळी तीनही सैन्य दलाकडून पुरावा दाखवण्यात आला. या पत्रकार परिषदेत नेमके कोणकोणत्या ठिकाणी कारवाई करण्यात आली याचे पुरावे देखील सादर करण्यात आले. डीजीएमओ राजीव घई म्हणाले, भारतीय सैन्याने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. आमच्या टारगेटवर बहावलपूर होते. त्यामध्ये लाहोरमधील डिफेन्स स्थळ नष्ट केले असून नऊ ठिकाणी हल्ले करून सुमारे १०० दहशदवाद्यांचा खात्मा केला. तसेच कसाबने प्रशिक्षण घेतलेले स्थळही उद्ध्वस्त केले. याशिवाय भारताच्या एअर अटॅक सिस्टीमने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडले. यामध्ये मोठ्या कारवाईत तीन मोठे दहशतवादीही मारले गेले. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम संपवली. या कारवाईत अनेकदा पाकिस्तानने नागरी विमानांचा आधार घेतला, असेही यावेळी सांगण्यात आले. 40 पाक सैनिकांचा मृत्यू दहशतवादाचे गुन्हेगार आणि त्या मागच्या लोकांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे या स्पष्ट लष्करी उद्दिष्टासह ऑपरेशन सिंदूरची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूकतेने लक्ष्य करण्यात आले.बुधवार दि.७ मे रोजी सकाळी लष्कराने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. त्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये दहशतवादी युसूफ अझहरचा समावेश आहे.तर ६ आणि ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशनमध्ये ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.