पाकिस्तान आपल्या कृ्त्यापासून थांबेना! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावरच केला मोठा आरोप, म्हणाले…

Pakistan Prime Minister Shahbaz Sharif : शनिवारी अनेक तासांपासून नाट्यमय घडामोडींनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या कृत्यांपासून थांबलेला नाही. पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले असून पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर आपला खरा चेहरा समोर आणला आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावरच मोठा आरोप केला आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना संबोधित करताना शरीफ यांनी भारतावर युद्धाचा आरोप केला आहे.
भारत-पाकिस्तान तणावामुळे भारताने युद्धबंदीचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने यातच आपला विजय असल्याचे म्हटले आहे. आम्ही शत्रूविरुद्ध एका सन्माननीय राष्ट्रासाठी जे योग्य होते ते केले. हा केवळ सशस्त्र दलांचाच नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिली आहे. तसेच शरीफ यांनी भारताच्या राफेल लढाऊ विमानांना पाकिस्तानी हवाई दलाने लक्ष्य केले आणि पाडले असल्याचा खोटा दावा केला आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सतत माहिती देण्यात आली. भारताने केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे भारताने म्हटले होते. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे निष्पाप लोक, मशिदी आणि नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. भारताने आपल्या अहंकारात आपली प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, असल्याचे ते म्हणाले.





