Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये रेल्वेचे अपहरण; काय आहेत BLAच्या मागण्या? पाकिस्तान विघटनाच्या मार्गावर?

Pakistan Train Hijack: बलुच लिबरेशन आर्मीने आज मंगळवारी (दि. 11) पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रेल्वेचे अपहरण केले आहे. बीएलएच्या म्हणण्यानुसार, 182 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून, आतापर्यंत 20 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय एक ड्रोनही पाडण्यात आले आहे. ट्रेनचे अपहरण केल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात, बीएलएने शाहबाज सरकारला स्पष्ट इशारा दिला आणि म्हटले की जर पाक सैन्याने त्यांच्यावर कारवाई केली तर ते सर्व ओलीस ठार मारले जातील.
बीएलएने चेतावणी दिली की हवाई हल्ला त्वरित थांबवला नाही तर येत्या एक तासात सर्व ओलीस मारले जातील. मात्र, या घटनेवर पाकिस्तानी लष्कर-पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएचा सामना करण्यासाठी पाक लष्कर हवाई हल्ल्याची तयारी करत असून हवाईशी संबंधीत यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
काय आहेत BLAच्या मागण्या?
बीएलए अनेक दिवसांपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही सुरक्षा एजन्सीचे लोक नसावेत, अशी बीएलएची मागणी आहे. तसेच चीनसोबत सुरू असलेले सर्व सीपीईसी प्रकल्पही हटवण्याची मागणी आहे.
‘बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर’ – निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी
जाफर एक्स्प्रेस ट्रेनवरील हल्ल्याबाबत निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी म्हणाले, ‘बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर आहे. पाकिस्तानी लष्करात निराशा पसरली आहे. बलुचिस्तानमधील ट्रेन अपहरणाची घटना अत्यंत महत्त्वाची आहे. ट्रेनमध्ये 450-500 लोक होते आणि दहशतवाद्यांनी या सर्वांना ओलीस ठेवले आहे. मला वाटत नाही की पाकिस्तानी लष्कर कोणतीही जीवितहानी न होता ओलिसांची सुटका करण्याचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडू शकेल. हे अतिशय अचूक ऑपरेशन्स आहेत, जे आमचे NSG अतिशय कार्यक्षमतेने पार पाडतात.
‘पाकिस्तान विघटनाच्या मार्गावर’ – जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद
बलुचिस्तानमधील जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद म्हणाले, ‘पाकिस्तानचे लष्कर आणि सरकारचे बलुचिस्तानवरील नियंत्रण सुटले आहे.’ पाकिस्तानचे मौलाना फजलुर रहमान यांच्या वक्तव्याचा हवाला देत एसपी वैद म्हणाले की, बलुचिस्तानमधील 6-7 जिल्हे पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत, जेथे पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशा स्थितीत हे सर्व घडले यात नवल नाही. पाकिस्तान विघटनाच्या मार्गावर आहे.





