टी-२० विश्वचषक २०२२ मधील सर्वात रोमांचक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी करत पाकिस्तानला ४ गडी राखून पराभूत केले. सामन्यात विराटने ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा करत पाकिस्तानच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. त्याची ही खेळी पाहून पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी त्याचे कौतुक देखील केले आहे. मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा विराटला टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घे, आसा सल्ला देत आहे.
#T20WorldCup : आयर्लंडने केला दुसरा उलटफेर, वेस्ट इंडिजनंतर केली आता इंग्लंडची शिकार
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे.” यासोबतच अख्तरने इफ्तिखार अहमद, शान मसूद आणि पाकिस्तानी संघाचेदेखील जोरदार कौतुक केले. मसूद आणि इफ्तिखार यांच्या अर्धशतकांमुळेच पाकिस्तानी संघाला १५९ धावा करता आल्या होत्या. त्याचबरोबर शोएबने वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह यांचेही कौतुक केले. या दोघांनी ३१ धावांवर भारताच्या ४ गड्यांना बाद केले होते.
यावेळी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, “पाकिस्तानने चांगली कामगिरी केली आहे. निराश होऊ नका, तुम्ही सर्वजण खरोखरच चांगले खेळले. भारताने त्यांच्या बाजूने चांगली कामगीरी केली. त्यांनी इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. या सामन्यात सर्व काही घडले – झेल सुटले, रन आऊट, नो-बॉल, वाद, स्टंपिंग. विश्वचषक नुकताच सुरू झाला आहे मात्र विश्वचषक तेव्हाच सुरू होतो जेव्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने खेळतात. या विश्वचषकात पाकिस्तान आणि भारत पुन्हा एकमेकांशी भिडतील”, असेही अख्तरने म्हटले आहे.
त्यानंतर अख्तरने विराट कोहलीचे कौतुक केले आणि म्हणाला, “जेव्हा इरादे तुटतात तेव्हा आत्मविश्वास पाहायला मिळतो आणि जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा अस्सल क्रिकेट कौशल्य पाहायला मिळते आणि त्याचे नाव विराट कोहली आहे. मला वाटते की त्याने आयुष्यातील सर्वात मोठी खेळी खेळली आहे. तो खेळला कारण त्याला खात्री होती की, तो हा सामना भारताला जिंकून देऊ शकतो. यादरम्यान त्याचे कौशल्य आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला.”
अख्तर कोहलीबद्दल पुढे म्हणाला, “तो पूर्ण आत्मविश्वास आणि ताकदीने परतला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे कारण त्याने आपली सर्व शक्ती टी-२० क्रिकेटमध्ये लावावी असे मला वाटत नाही. आजच्या प्रमाणे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त काळ वर्चस्व मिळवू शकतो.”