नवी दिल्ली – जम्मू काश्मीरला राज्यातील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताला विरोध केला आणि कित्येक वेळा युद्धाची भाषा करणारी धमकीही दिली. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अनेक देशांकडे मदत मागितली. परंतु पाकिस्तानला चीन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाने मदत केली नाही. परंतु मुस्लीम देशांकडून पाकिस्तानला मात्र एक सूचना करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीने(यूएई) पाकिस्तानला भारतासोबत बॅकडोअर डिप्लोमसीचा वापर करण्याची सूचना दिली आहे.
यासोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर भाषा वापरण्यावर आळा घालण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री आदिल अल जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानने भारताशी अनौपचारिक चर्चादेखील करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यांनी आपल्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि सैन्यदलाचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली होती.
यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेला गोपनीय ठेवण्यात आले होते. तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छाही व्यक्त केली.