Pakistan Attack : पाकिस्तानचा आणखी एक ना’पाक’ हल्ला भारताने हाणून पडला; तणावामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित

Pakistan Attack : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. आज पुन्हा एकदा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. त्याच वेळी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.
तर दुसरीकडे, चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील फिरोजपूर आणि राजस्थानमधील जैसलमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांचे ४ ड्रोन पाडल्याचे समजत आहे.
राजौरीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन :
शुक्रवारी संध्याकाळी जम्मू शहरात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे हे स्फोट झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले.
तणावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित :
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू, कठुआ, सांबा, उधमपूर, राजौरी आणि पूंछ यासारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन दिसले, जे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ताबडतोब निष्क्रिय केले.
सुरक्षेच्या कारणास्तव होशियारपूर जिल्ह्यात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या उपायुक्त आशिका जैन यांनी हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आदेश जारी केला आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
श्रीनगर विमानतळ १४ मे पर्यंत बंद :
पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि सीमेवरील तणावामुळे श्रीनगर विमानतळ १४ मे पर्यंत बंद करण्यात आले आहे. यासोबतच जम्मू आणि बारामुल्लासारख्या प्रमुख भागातही ब्लॅकआउट लागू करण्यात आले आहे.
‘घराबाहेर पडू नका…’; ओमर अब्दुल्ला यांचे आवाहन
उमर अब्दुल्ला म्हणाले, “जम्मू आणि आसपासच्या सर्व लोकांना माझे नम्र आवाहन आहे, की कृपया रस्त्यांपासून दूर रहा, घरी किंवा जवळच्या ठिकाणी रहा जिथे तुम्हाला पुढील काही तास आरामात राहता येईल. अफवांवर लक्ष देऊ नका, निराधार किंवा असत्यापित कथा पसरवू नका आणि आपण एकत्रितपणे यावर उपाय करू.” असं ते म्हणाले.





