‘भित्रे होते ते पाकिस्तानात पळून गेले, आम्ही पळून जाणाऱ्यांमधले नाही’, होळीला मशिदींना झाकल्याने ओवैसींचा संताप

Asaduddin Owaisi | होळीच्या निमित्ताने देशातील अनेक भागांमधील मशिदींना ताडपत्रीने झाकण्यात आले. उत्तर प्रदेशमधील जवळपास 180 अधिक मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. जे भित्रे होते, ते पाकिस्तानला गेले. भारतालाच आम्ही आमचा देश मानतो, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
हैदराबादमधील एका सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले की, मुस्लिमांना त्यांच्याच देशात दुय्यम दर्जाचे नागरिक का मानले जात आहे. कोणीतरी म्हणते की जर तुम्हाला भीती वाटत असेल तर नमाज अदा करू नका, घरी बसा. कोणीतरी म्हणते की ज्याप्रमाणे मशिदी झाकल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचे डोके झाकले पाहिजे.
कोणीतरी म्हणतंय की जर आपण बंगालमध्ये सत्तेत आलो तर आपण बंगालमधून मुस्लिमांना हाकलून लावू. जे भित्रे होते ते पाकिस्तानात पळून गेले. आम्ही पळून जाणाऱ्यांमधले नाही. आपली लोक विश्वासाच्या संपत्तीने समृद्ध होते. त्यांनी भारताला आपला देश मानले आणि पुढेही ते असेच मानतील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
ओवैसी पुढे म्हणाले की, आमचा स्वाभिमान हिरावला जात आहे. तुम्ही दुसऱ्या दर्जाचे शहरी रहिवासी आहात असे म्हटले जात आहे. मात्र, आम्ही तुमच्याशी लोकशाही पद्धतीने लढू आणि तुम्ही हराल.
‘एक मुख्यमंत्री म्हणत आहेत की तुम्ही घरीच शुक्रवारची नमाज अदा करावी. आता आपल्याला त्यांच्याकडून धर्म शिकावा लागेल. आणि आपण घरी काय करू शकतो? तिथे मशीद आहे, धार्मिक श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे. आपण मशिदीत जात राहू. कलम 25 ने आपल्याला हे करण्याची परवानगी दिली आहे.’, असे म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, होळी व धुळवडीच्या निमित्ताने देशभरातील अनेक भागांमधील मशिदींना झाकण्यात आले होते. तसेच, यावेळी अनेक भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचेही दिसून आले.





