हैदराबाद : लोकसभा मतदारसंघांची फेररचना केवळ लोकसंख्येच्या आधारे करण्याला विरोध दर्शवणारा ठराव तेलंगणा विधानसभेने मंजूर केला. लोकसंख्येवर आधारित फेररचना झाल्यास दाक्षिणात्य राज्यांमधील लोकसभेच्या जागा ५ ते ६ टक्क्यांनी घटतील, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंथ रेड्डी यांनी केला. प्रस्तावित फेररचनेवरून दाक्षिणात्य राज्यांमधील राजकारण तापले आहे. अशात तेलंगणा विधानसभेत ठराव मंजूर करण्याची घडामोड घडली. तो ठराव मांडताना रेड्डी यांनी नामोल्लेख टाळून भाजपवर टीकास्त्र सोडले. दाक्षिणात्य राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा पक्ष करत आहे. त्यामागे केंद्र सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत दाक्षिणात्य राज्यांचे महत्व कमी करण्याची खेळी आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारे फेररचना झाल्यास दाक्षिणात्य राज्यांचा लोकसभेच्या एकूण जागांमधील वाटा २४ टक्क्यांवरून घटून १९ टक्के होईल. तेलंगणाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी एकवटून केंद्र सरकारला आवाहन करावे. केंद्र सरकारने आमची भूमिका मान्य केली तर चांगलेच होईल. अन्यथा, आम्हाला लढा उभारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. याआधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्या पुढाकारातून फेररचनेसंदर्भात बैठक झाली. आता पुढील बैठकीचे आयोजन रेड्डी करणार आहेत.