अग्नीवीर बनण्याची संधी! १० एप्रिलपर्यंत करा अर्ज, ४ वर्षांत १० लाख मिळणार – इंडियन आर्मीची मोठी घोषणा

नवी दिल्ली– इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर म्हणून सामील होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना 10 एप्रिल 2025 पर्यंत भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावे लागतील. अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in वर जाहिरात वाचा आणि https://joinindianarmy.nic.in/jco-or-enrollment.html वर ऑनलाइन अर्ज सादर करा.
कोणत्या पदांसाठी अर्ज करता येणार?
उमेदवार अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेड्समन आणि कॉर्पस ऑफ मिलिटरी पोलिसमध्ये अग्नीवीर वुमन जनरल ड्युटी या पदांसाठी अर्ज करू शकतात. प्रत्येक उमेदवाराला दोन श्रेणींसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
पात्रता काय?
अर्जदारांचे वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असावे (1 ऑक्टोबर 2025 च्या आधारावर). केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1.6 किमी धावणे, पुलअप्स आणि इतर शारीरिक चाचण्या अनिवार्य आहेत. पुरुष आणि महिला उमेदवार अविवाहित असावेत. विधवा, घटस्फोटित किंवा कायदेशीररित्या वेगळ्या झालेल्या महिलाही अर्ज करू शकतात, पण काही नियम लागू असतील.
परीक्षा आणि सुट्ट्या –
अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा जून 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे, पण अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. ही परीक्षा 13 भाषांमध्ये होईल, ज्यात मराठी, हिंदी, इंग्रजी यांचा समावेश आहे. निवड झालेल्या अग्नीवीरांना दरवर्षी 30 दिवसांची सुट्टी मिळेल, तर आजारपणाच्या सुट्ट्या वैद्यकीय सल्ल्यानुसार दिल्या जातील.
पगार आणि फायदे
पहिले वर्ष: एकूण पॅकेज 30,000 रुपये – 21,000 हातात, 9,000 अग्नीवीर कॉर्पस फंडात (सरकारही 9,000 जमा करेल).
दुसरे वर्ष: 23,100 हातात, 9,900 फंडात.
तिसरे वर्ष: 25,550 हातात, 10,950 फंडात.
चौथे वर्ष: 28,000 हातात, 12,000 फंडात.
चार वर्षांनंतर अग्नीवीराला त्याच्या 5.02 लाख आणि सरकारच्या 5.2 लाखांसह एकूण 10.04 लाख रुपये मिळतील. याशिवाय, 48 लाखांचे विमा संरक्षण मिळेल.
चार वर्षांनंतर काय?
अग्नीवीरांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. त्यानंतर 25% अग्नीवीरांना भारतीय सैन्यात नियमित संवर्गात सामावून घेतले जाईल. दरम्यान, अग्नीवीर होण्याची ही संधी तरुणांसाठी करिअर आणि आर्थिक सुरक्षिततेची हमी देते. 10 एप्रिलपूर्वी अर्ज करून तुम्हीही देशसेवेचा भाग बनू शकता.





