छत्रपती संभाजीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घोषित केलेल्या नमो 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.
अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या.
त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. नमो महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत 73 लाख महिलांना विविध योजनांचे लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे.
परंतु प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना यापूर्वी सुरू होती. तसेच 73 हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत, यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होती.
त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोलघेवडेपणा केला असल्याचे दानवे म्हटले आहे. तब्बल 54 हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी 13 हजार बांधकाम कामगारांना मार्च 2023 पर्यंत मदत मिळाली नाही.
त्यामुळे नमो कामगार कल्याण अभियानाअंतर्गत संच वाटप हा कार्यक्रम 73 हजार बांधकाम कामगारांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप दानवे यांनी केला.