वॉशिंग्टन, दि. 30- करोना रुग्णांपैकी केवळ 15 टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत.
85 टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिक यांनी म्हटले आहे. तर अध्यक्ष ट्रेड्रोस घेब्रयासिस म्हणाले की, भारताला चार हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून दोन हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.
भारतात आलेल्या करोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. करोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उदभवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.