पुढील वर्षी ‘या’ महिन्यापर्यंत कांदा निर्यातीवर बंदी ! देशांतील बाजारपेठांमध्ये भाववाढ होऊ लागल्याने घेतला निर्णय

नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीला बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत ही बंदी लागू राहिल. विदेश व्यापार महासंचालनालयाने या संबंधात आज अधिसूचना जारी केली आहे. देशातील कांद्यांचे दर ७० ते ८० रूपये किलो या पातळीवर गेले आहेत. दिल्लीत हा दर ८० रूपये किलोवर गेला आहे.
यापूर्वी, केंद्राने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो अनुदानित दराने बफर स्टॉक मधील कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता.
किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वी अनेक पावले उचलली आहेत. ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते.विदेश व्यापार विभागाने म्हटले आहे की, इतर देशांनी विनंती केली तर त्यावर विचार करून कांदा निर्यातीला स्वतंत्रपणे अनुमती दिली जाणार आहे.ही अधिसूचना जारी होण्यापुर्वी ज्या कांद्याचे निर्यातीसाठी लोडिंग सुरू झाले होते, त्या कांद्याच्या शिपमेंटला निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट या कालावधीत देशातून ९.७५ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. बांगलादेश, मलेशिया आणि यूएई हे भारतातून कांदा आयात करणारे तीन मुख्य देश आहेत. सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात कांद्याची आवक कमी झाल्याच्या बातम्यांमुळे कांद्याचे भाव वाढू लागले आहेत.





