शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; रब्बीच्या पेरण्या होणार : पिकांना नवसंजीवनी
नगर – नगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. मागील एक महिन्यापासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पिण्याच्या पाणी योजना ही अडचणीत आल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसापासून नगर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहरासह परिसरात काही मध्यम, हलक्या प्रमाणात, तर बुधवार सकाळपासून तर गुरुवारी दुपारपासून सलग तिसऱ्यादिवशी पाऊस कोसळला. त्यामुळे नगर शहर व उपनगर परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर सुद्धा झाला. पावसामुळे दिल्ली गेट, चितळे रोड, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी चौक अशा विविध भागांमध्ये पाणी साचले होते. रस्त्यांवरील खड्डे ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. सततच्या पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे.
मागील महिन्यापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी तीन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसान काहीसा सुखावला आहे. अखेरच्या घटका मोजणाऱ्या खरीप पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. तर रब्बीच्या पेरण्या करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.मात्र या पावसाने काही भागात बाजारी व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
आज अखेर सर्वाधिक पाऊसाची नोंद ही अकोले तालुक्यात झाली असून 223 टक्के पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ संगमनेर, नेवासा, कोपरगाव मध्ये 102 टक्के पावसाची नोंद झाली आहे. श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात 75 टक्के तर, राहाता, शेवगामध्ये 70 टक्के पाऊस आज अखेर पडला आहे. सर्वार्धिक कमी पावसाची नोंद ही कर्जत, जामखेड तालुक्यात झाली असून कर्जत मध्ये 39 तर जामखेडमध्ये 58 टक्के पाऊस पडला आहे. नगर तालुक्यात 81 टक्के नोंद झाली आहे.