Oath ceremony of Chief Minister : राजस्थानमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; भजनलाल म्हणाले,”पंतप्रधानांची प्रत्येक गॅरंटी पूर्ण करू”

Oath ceremony of Chief Minister : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा आज विराजमान होणार आहेत. त्यांच्याशिवाय दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी याविषयी माहिती दिली आहे. यावेळी बोलताना जोशी यांनी, जयपूरच्या राम निवास बागेत शपथविधी सोहळा होणार आहे. आज सकाळी 11.15 वाजता शपथविधी पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते तेथे सहभागी होणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर भजनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शपथ घेण्यापूर्वी भजनलाल शर्मा यांनी,”राजस्थान हे आमचे आघाडीचे राज्य झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी जनतेला दिले.
राजस्थानचे नियुक्त मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज शपथविधी सोहळ्यापूर्वी आचार्य मृदुल शास्त्रीजी यांचे आशीर्वाद घेतले. भजनलाल शर्मा यांनी यावेळी, ‘मी संत आणि गुरुजींचा आशीर्वाद घेतला आहे. आम्ही पीएम मोदींची हमी राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवू.” असे म्हटले आहे.
आधी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि नंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करून भाजपने सर्वांनाच धक्का दिला आहे. भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि सांगानेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भाजपने भजनलाल शर्मा यांच्याशिवाय दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी उमेदवारी दिली आहे. दिया कुमारी यांचा समावेश त्या खासदारांमध्ये होतो ज्यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत उतरवले होते.
भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजाचे आहेत. बाहेरचे असल्याचा आरोप असतानाही ते सांगानेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. उपमुख्यमंत्रिपदासाठी नामांकन झालेल्या दिया कुमारी या जयपूरच्या राजघराण्यातील आहेत. अनुसूचित जातीतून आलेल्या प्रेमचंद बैरवा यांना भाजपने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त केले आहे.





