Prithviraj Chavan : कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली नाही : पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य; केली ‘ही’ मोठी मागणी
Prithviraj Chavan : देशातील कोणत्याही राजकीय पक्षात आता अंतर्गत लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, असे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे.

Prithviraj Chavan : देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकशाहीच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “आज जे काही चाललं आहे, त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल. पैशांचा जो गैरवापर सुरू आहे, त्याला आपण लोकशाही म्हणू शकतो का?” असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच देशातील कोणत्याही राजकीय पक्षात आता अंतर्गत लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, असे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे देशात लोकशाही व्यवस्था राबवली जात असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले की, संविधान कितीही चांगले असले, तरी ते अप्रामाणिक लोकांच्या हातात गेल्यास त्यातून चांगले घडणार नाही. त्यामुळे केवळ संविधान चांगले असून उपयोग नाही, तर ते राबवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाही प्रामाणिक असणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘पक्षांतर बंदी कायद्याचा हेतू चांगला होता’
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या काळात आणलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचा संदर्भ दिला. आमदार आणि खासदारांकडून होणाऱ्या पक्षांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला होता. त्यामागे चांगला आणि शुद्ध हेतू होता, असे त्यांनी सांगितले.
मात्र, २००३ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी या कायद्यात बदल केला. त्यावेळी जेटली यांनी आपल्याला उद्देशून “पृथ्वीराज, हमने कानून बदला है, अब अँटी डिफेक्शन नहीं होगा,” असे म्हटल्याची आठवण चव्हाण यांनी सांगितली. मात्र, कायद्यात बदल केल्यानंतर पक्षांतर थांबण्याऐवजी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाल्याचे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बाबतीत जे घडले, त्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. मात्र, विद्यमान पक्षांतर बंदी कायदाच प्रभावीपणे काम करत नसल्याचे चव्हाण यांनी सूचित केले.
‘पक्षांतर बंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत टाका’
सध्याचा पक्षांतर बंदी कायदा रद्द करून अधिक सोपा आणि प्रभावी कायदा करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “सध्याचा पक्षांतर बंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत टाकला पाहिजे. सोपा कायदा करा. तुम्ही जर पक्षाच्या विरोधात मत केलं, तर तुमचा सगळा अधिकार संपून जाईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांवरही त्यांनी गंभीर आरोप केले. देशातील या संस्थांनाही ‘कॅप्चर’ करण्यात आले असल्याचा दावा करत, “काही करून निवडणूक जिंका, हाच राजमार्ग ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खळबळजनक दावा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“जिंकण्यासाठी मतदाराला पाच-पाच लाख रुपये दिले,” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सध्याच्या राजकीय आणि निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Rohit Pawar: राजीनामा द्या, नाहीतर गणेशोत्सवात…’ रोहित पवारांचा सरकारला कडक इशारा






