‘नो’ पार्किंग’चे फलक गायब, पण टोईंग व्हॅनचा दणका सुरूच! वाहनचालकांना विनाकारण भुर्दंड, पालिका गप्प का?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेने तसेच पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगला बंदी घातलेली आहे, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून पार्किंग केलेली वाहने उचलली जातात. मात्र, अशा जागांवरील नो पार्किंग चे फलकच गायब असल्याने वाहनचालकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून फलक बसविण्याबाबतचे पत्र महापालिकेस देण्यात आले असले तरी पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सामान्य नागरिकांना मात्र मनस्ताप भोगावा लागत आहे.
शहरातील प्रमुख तसेच वर्दळीच्या रस्त्यावर नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून टो करून उचलली जातात. दंड आकारून त्यातील ५० टक्के निधी पालिकेला दिला जातो. नो पार्किंग सूचना फलक लावणे बंधनकारक असताना जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, कर्वे रस्ता, मध्यवर्ती पेठा, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, स्वारगेट परिसरात अशा वर्दळीच्या ठिकाणचे नो पार्किंगचे फलकच गायब झाले आहेत.
गणेशोत्सव काळात मंडळांनी रस्त्याकडेला मांडव टाकताना कमानी उभारताना अनेक ठिकाणचे असे फलक काढून टाकले होते, ते पुन्हा लावलेले नाहीत. परिणामी, अशा ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने काही वेळातच पोलिसांकडून ती उचलली जात आहेत.
व्यावसायिकांशी संगनमताने प्रकार?
नो पार्किंगमध्ये अनेकदा तेथील व्यावसायिकांची वाहने पार्क केली जातात, अशी वाहने दिसल्याने अन्य नागरिकही आपली वाहने उभी करतात. पोलीस आल्यास त्या दुकानातील कोणीतरी वाहनावर येऊन बसतात. पोलिसही व्यावसायिकाचे वाहन सोडून इतर सर्व वाहने उचलतात. त्यामुळे अशा नो पार्किंगच्या ठिकाणी व्यावसायिक व पोलीस संगनमताने हा प्रकार करीत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





