Rahul Gandhi Lok Sabha Election 2024| काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल बुधवारी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी यांच्याकडे सध्या 55,000 रुपये रोख रक्कम आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचं एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते. राहुल गांधी यांच्याकडे 9,24,59,264 रुपयांची जंगम मालमत्ता आणि एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपये आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये इतकी आहे.
राहुल गांधी यांच्यावर 49,79,184 रुपयांचं देणं आहे. दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनीचे ते आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी मालक आहेत. या जमिनी 2.346 आणि 1.432 एकर आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्कानं मिळालेली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे. राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये होती.
शेअर बाजारात 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक Rahul Gandhi Lok Sabha Election 2024|
राहुल गांधी यांनी त्यांच्या नावावर बँकेत 26.25 लाख रुपये ठेव असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शेअर बाजारात त्यांची एकूण गुंतवणूक 4.33 कोटी रुपये आहे. राहुल गांधी यांचीही म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक 15.2 लाख रुपये आहे.
त्यांच्याकडे 4.2 लाख रुपयांचे दागिनेही आहेत. राहुल गांधींकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही. पण गुरुग्राममध्ये 9 कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग त्यांच्या नावावर आहेत. त्यांची किंमत 9 कोटींहून अधिक आहे. याशिवाय राहुल गांधींच्या नावावर एनएसएस, पोस्टल सेव्हिंग आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.
2019 मध्ये 15 कोटी रुपये संपत्ती Rahul Gandhi Lok Sabha Election 2024|
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी त्यांच्यावर 72 लाख रुपयांचं कर्ज होतं. गेल्या 5 वर्षांत राहुल गांधी यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटींची वाढ झाली आहे.
राहुल गांधींनी 2019 साली अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. परंतु अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. तर वायनाडमधून ते चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. यावेळी दुसऱ्या टर्मसाठीही राहुल गांधींनी वायनाडमधूनच लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; नेमकी का केली कारवाई?