‘नीटच्या एकही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही’; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आश्वासन

नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप फेटाळले आहेत. या परीक्षेला बसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश असेल, तो सरकार पाळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, नीट परीक्षेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. तसेच पेपर देखील फुटलेला नाही. जी काही गडबड झाली आहे, त्याचा शोध घेऊन दोषींना शिक्षा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, वैद्यकीय पदवीसाठी पाच मे रोजी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (NEET) आयोजन करण्यात आले होते. यातील जवळपास 1563 परीक्षार्थींना जादा मार्क देण्यात आले होते. त्यांचे मार्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत सांगितले की, केवळ या 1563 विद्यार्थ्यांसाठीच दुसऱ्यांदा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. 30 जून रोजी याचे निकाल जाहीर होतील.





