Archana Patil : धाराशिव जिल्ह्यात मुलांच्या अभ्यासावर टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापराचा होणारा परिणाम लक्षात घेऊन एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. या वेळेची सूचना देण्यासाठी गावांमध्ये भोंगा वाजवला जाईल. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याला एक गाव दत्तक दिले जाणार असून, त्यावर देखरेख ठेवली जाईल. जिल्ह्यातील सुमारे 760 ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सेमी-इंग्रजी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी विशेष वाचन मोहीमही राबवली जाणार आहे. या उपक्रमाची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरू असून नागरिकांकडून त्याचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावागावांत विशेष पथके तयार केली जाणार आहेत. ही पथके संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत गस्त घालत घराघरांत जाऊन टीव्ही बंद आहेत का आणि मुले अभ्यास करत आहेत का, याची खातरजमा करतील. या संदर्भात अर्चना पाटील यांनी पालकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दररोज दोन तास टीव्हीपासून दूर राहण्याची सवय लावावी, असे त्यांनी सांगितले. हा उपक्रम केवळ प्रशासनाचा नसून संपूर्ण समाजाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असले तरी घराघरात टीव्ही बंद करण्याच्या सक्तीबाबत नागरिकांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा : Jay Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जय पवारांची भूमिका काय? म्हणाले “मला वाटतं की…”