नवी दिल्ली – देशातल्या वाढत्या महागाई आणि बेरोजगारीने देशातील जनतेचा अमानुष छळ सध्या चालला आहे असा आरोप करतानाच मोदी सरकारने देशातील लोकशाहीची हत्या केली असून या हत्येचा संपुर्ण देश साक्षीदार बनला आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पक्ष मुख्यालयात आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांना हा आरोप केला. आम्ही लोकशाही आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत म्हणूनच आमच्या परिवारावर मोदी सरकारकडून हल्ला केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की आज देशातील नागरीकांपुढे महागाई बेरोजगारीपासून सरकारच्या दडपशाहीच्या अनेक समस्या आहेत. पण या विषयांना कधी वाचाच फुटू नये असा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे.देशात लोकशाही नावाची चीजच अस्तित्वात राहिलेली नसून संपुर्ण देशात चारच माणसांची हुकुमशाही सुरू आहे.
गेल्या 70 वर्षात वीट अन वीट रचून या देशाची उभारणी केली गेली आहे. ही सारी उभारणी मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात उद्धवस्त करून टाकली आहे. आणि हा सारा विध्वंस लोकांच्या डोळ्यासमोर सुरू आहे. आपल्यावरील अन्यायांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांची धरपकड केली जात आहे, त्यांना तुरूंगात डांबून मारहाण केली जात आहे असेही त्यांनी नमूद केले. अशी कितीही दडपशाही झाली तरी आम्ही लोकांच्या प्रश्नावरील आवाज उठवतच राहणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेत नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी झालेल्या कारवाई विषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारताच ते म्हणाले की यात प्रकरणात काहीही गैर झालेले नाही हे सारा देश जाणतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तंत्राने सध्या देश चालवला जात असून त्याला आमचा विरोध आहे. मी विरोधी करतो म्हणून माझ्यावर कारवाया सुरू आहेत. पण या कारवाया मी आनंदाने सहन करीन, या आणि मला अटक करा असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.
या देशातील नागरीकांसाठी लढणे ही आमची जबाबदारी आहे, त्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांनी हौतात्म पत्करले आहे. मी ही लढाई सोडू शकत नाही, आमच्यावर कितीहीू दडपणे आली तरी मी हे काम करीतच राहीन असा निर्धारही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.