Rohit Pawar : “कितीही अडथळे आणले तरी ….”; अन्नत्याग आंदोलनापूर्वी रोहित पवारांचा गंभीर आरोप, फोटो केले शेअर
Rohit Pawar : या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

Rohit Pawar : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
त्यानुसार आजपासून ते आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी एक्सवरुन एक ट्वीट करत विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा गंभीर आरोप केला आहे.
रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलनाची केली होती घोषणा
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आंदोलनाची माहिती देताना, २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. तसेच एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल करून दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करून एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा : Malhar Lake: कोंढापुरीचा ‘मल्हार तलाव’ झाला कोरडा ठाक! शिरूरच्या पाणी नियोजनाची पोलखोल
सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवांच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत १२ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे रोहित पवारांनी जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, ही अपेक्षा! असे म्हटले होते. यावर सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याने त्यांनी पंढपूर येथे आंदोलनाची हाक दिली आहे.
विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय… त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले… pic.twitter.com/jwXJS26zCQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी रोहित पवारांनी काय ट्वीट केलंय?
विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय… त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं. उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय…
पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये…! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
|| राम कृष्ण हरि ||
अन्नदाता जगला तरच दुनिया सारी..
म्हणूनच मायबाप सरकार विनाअट कर्जमाफी करा लवकरी..असेही रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : Dangerous Buildings: सावधान! सातारा शहरात ३८५ इमारती धोकादायक; ६ इमारतींना पालिकेची थेट नोटीस






