Nitish Kumar on Budget – राजकारणामध्ये कोणीच कोणाचा ना कायमचा क्षत्रू असतो ना मित्र असं म्हंटल जातं. याचीच प्रचिती नुकतीच नितीश कुमार यांनी मारलेल्या पलटीवरून संपूर्ण देशाला आली. निवडणूक भाजपसोबत लढलेले नितीश कुमार, निवडणुकांनंतर राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस आघाडीसोबत आले.
मात्र या महाआघाडीतही ते फार काळ रमले नाहीत. नुकतीच त्यांनी पुन्हा एकदा पलटी मारत, आपला पक्ष भाजपच्या ओसरीशी नेला आहे.
भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमार यांचे बोल देखील चांगलेच बदलले आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नितीश कुमार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
राजद व काँग्रेससोबत सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणावर तिखट शब्दात प्रतिक्रिया देणारे नितीश कुमार हेच आहेत का, असा प्रश्न कदाचित त्यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया ऐकून बिहारच्या सामान्य जनतेला पडला असेल.
काय म्हणाले नितीश कुमार? | Nitish Kumar on Budget
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सकारात्मक असून त्याचे स्वागत व्हायला हवे असं नितीश कुमार यांनी म्हटलंय. नितीश कुमार हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. आजच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तीन इकॉनॉमिक कॉरिडोअर उभारण्याच्या निर्णयाबाबतही नितीश कुमार यांनी समाधान व्यक्त केलं.
या निर्णयामुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होईल असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.