Nitin Gadkari : रणजितदादांचा शब्द अन् गडकरींचा मोठा निर्णय! फलटणसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर
Nitin Gadkari : दिवे घाटाचे रुंदीकरण पूर्ण, जेजुरीत होणार उड्डाणपूल; पालखी महामार्गाच्या कामाचा गडकरींनी घेतला आढावा.

Nitin Gadkari – पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, प्रामुख्याने दिवे घाटातील अरुंद रस्त्याची अडचण आता दूर झाली आहे. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून संपूर्ण काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. तसेच जेजुरी येथील बायपासला असलेला स्थानिक विरोध विचारात घेऊन त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
फलटणमधील रस्ते कामांसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार 97 कोटी रुपयांची विशेष तरतूद केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ना. नितीन गडकरी यांनी आज आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाची पाहणी केली. या पाहणी दौर्यादरम्यान फलटण तालुक्यातील सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा सादर केला.
या पत्रकार परिषदेस माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. रस्त्यांच्या कामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, मी कामाच्या दर्जाबाबत अत्यंत कडक असून रस्ते दर्जेदारच झाले पाहिजेत असा माझा आग्रह आहे.
या प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी आल्या, मात्र स्थानिक आमदार आणि खासदारांनी केलेल्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. या महामार्गाच्या बांधकामात ‘अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स काँक्रीट’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, तब्बल 13 पुलांसाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर केवळ रस्तेच नव्हे, तर पर्यावरण आणि पाणी नियोजनावरही भर देण्यात आला आहे.
या मार्गावर 46 तलाव बांधले असून 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत, तर 450 जुन्या झाडांचे यशस्वी पुनरोपण करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता हा महामार्ग ’ग्रीन हायवे’ व्हावा, यासाठी स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी झाडांचे संगोपन करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. हा मार्ग केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून यामुळे पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच शेतकर्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
234 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग
संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून, तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी अधिक सोईची व प्रशस्त होणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग एनएच-९६५ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र परंपरेशी जोडलेला हा मार्ग आळंदी ते पंढरपूर पुढे मोहळ ते वाखारी असा सुमारे 234 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, हा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामधून जातो. या प्रकल्पाची किंमत रु 7,625 कोटी असून पूर्णत्वास जात आहे.






