Nitin Gadkari : मुंबई-गोवा महामार्गाचे काम जूनपुर्वी संपणार; केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातही मुंबई – गोवा महामार्गाने जाताना अनेक अडचणी आ वासून उभ्या असतात. सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे वाहतूक कोंडीची. टप्प्याटप्प्याने सुरू असणारी आणि रेंगाळलेली मुंबई- गोवा महामार्गाची कामे नेमकी कधी संपणार, हाच प्रश्न प्रवाशांना त्रस्त करत असतो. मात्र केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी या रस्त्याचे काम जून अखेरपर्यंत संपेल, असे म्हटले आहे.
गोवा महामार्गाच्या कामात भरपूर अडचणी आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत महामार्ग विकासाचा या विषयावर ते बोलत होते.
राज्यातील व देशातील मोठे मोठे महामार्ग प्रकल्प नितिन गडकरी यांनी मार्गी लावताना पुर्णत्वास नेले आहेत. त्यांच्या काळात देखील मुंबई-गोवा महामार्गाचे काम ताटकळतच राहिले होते. मात्र, आता नितिन गडकरींनीच हे काम पुर्ण होणार असल्याचे सांगितल्याने, यावेळेस गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक खर्च कमी करावा लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिकचा खर्च हा ८ टक्के तर युरोपातील देशांत ११ टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक खर्च सध्याच्या जवळपास १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणले जाईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे हे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.





