केरळला ‘मिनी पाकिस्तान’ म्हणणाऱ्या राणेंच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी

केरळला ‘मिनी पाकिस्तान’ म्हणणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विजयन यांनी या वक्तव्याला ‘संविधानाचा अपमान’ म्हणत ते चिथावणीखोर आणि वाद निर्माण करणारे असल्याचे ठणकावले आहे.
भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान
पुण्यातील एका कार्यक्रमात नितेश राणे म्हणाले, “केरळ हे मिनी पाकिस्तान आहे… म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वायनाडमधून निवडून येतात. सगळे दहशतवादी त्यांना मतदान करतात. हे सत्य आहे, तुम्ही कोणालाही विचारू शकता. ते दहशतवाद्यांच्या पाठिंब्याने खासदार बनले आहेत.”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री विजयन यांनी राणे यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले, “संघ परिवाराच्या विचारधारेशी सुसंगत असे हे विधान केवळ केरळविरोधी नाही, तर देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरही हल्ला आहे. हा राजकीय हेतूपुरस्सर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे.”
संघ परिवारावर थेट हल्ला
विजयन यांनी राणे यांच्या विधानाला संघ परिवाराच्या राजकीय मानसिकतेचे प्रतीक ठरवले. “संघ परिवार जिथे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही, तिथे अशा प्रकारचे द्वेषयुक्त प्रचार सुरू करून त्या प्रदेशाला परकं करण्याचा प्रयत्न करतो,” असे विजयन म्हणाले.
यावेळी त्यांनी राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, “अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.”
काँग्रेसचा निषेध, सीपीआय(एम) वरही टीका
काँग्रेसनेही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले, “राणे यांनी केरळच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजयन यांनी या वक्तव्यावर स्पष्ट भूमिका मांडावी. मंत्री राजीनामा देतील किंवा त्यांना अपात्र ठरवले जाईल यासाठी काँग्रेस कायदेशीर आणि राजकीय लढा उभारेल.”
मात्र, काँग्रेसने या मुद्द्याला सीपीआय(एम) च्या अलीकडील वादग्रस्त विधानांशी जोडले. वायनाडच्या लोकसभा निवडणुकीतील राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या यशामागे ‘धार्मिक मुस्लिम आघाडी’ असल्याचा आरोप सीपीआय(एम) नेत्यांनी केला होता. “सीपीआय(एम) नेच वायनाडमधील राजकारणाला धार्मिक रंग देऊन भाजपला अशा विधानांना खतपाणी घालण्याची संधी दिली आहे,” असा आरोप काँग्रेसने केला.
वायनाड: राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू
वायनाड लोकसभा मतदारसंघात सुमारे ४१ टक्के मुस्लिम, ४५ टक्के हिंदू आणि १३ टक्के ख्रिश्चन मतदार आहेत. हा मतदारसंघ केरळमधील धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक मानला जातो. परंतु, या मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांना धार्मिक ध्रुवीकरणाच्या छायेत ढकलण्याचा भाजप आणि सीपीआय(एम) दोघांचाही प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी वायनाडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हाही भाजपने पाकिस्तानचा संदर्भ देत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवरच प्रियांका गांधींच्या अलीकडील विजयावरही वादग्रस्त विधानं झाली आहेत.
संविधानावरील हल्ल्याचा आरोप
मुख्यमंत्री विजयन यांनी नितेश राणे यांचे विधान हे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर हल्ला असल्याचे म्हटले. “सत्ताधारी पक्षाचे नेते अशा वक्तव्यांवर मौन का पाळत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विजयन यांनी संघ परिवाराचा ‘द्वेषमूलक राजकारणाचा अजेंडा’ उघड करत त्याला केरळमध्ये यश मिळणार नसल्याचा दावा केला.





