Nira News – आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता जगभर जाणवू लागला असून त्याची झळ भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन वाहतुकीवर परिणाम होत असताना भारतात मात्र सरकारकडून इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. पुरंदर तालुक्यातील नीरा येथेही एचपी गॅसच्या विविध एजन्सींवर गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सिलिंडर मिळत नसल्याने लोकांना सकाळपासून एजन्सीबाहेर तासनतास थांबावे लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आधी बुकिंग करण्याचा आग्रह वितरकांकडून धरला जात असून त्यासाठी ओटीपीची अटही घालण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात बुकिंग करण्यासाठी दिलेले फोन नंबर सतत बिझी लागत असल्याची किंवा बंद असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. अनेकांना दोन-दोन दिवस ओटीपीही मिळत नसल्याने सिलेंडर मिळवणे अधिकच कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानावळीचा दरवळ हरवला वितरकांकडून ग्राहकांना वेगवेगळी माहिती दिली जात असल्याचीही तक्रार आहे. पूर्वी २१ दिवसांनी मिळणारा सिलिंडर आता ३० दिवसांनी मिळेल, तर तीन महिन्यांत फक्त अडीच सिलिंडर मिळतील, असे सांगितले जात असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे सरकार मात्र इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. परिस्थितीचा सर्वाधिक फटका हॉटेल व खानावळ व्यवसायिकांना बसत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर मिळणेही कठीण झाले असून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आता लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू करण्याची वेळ आली आहे. काहींनी तर गॅसअभावी आपले हॉटेल तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून ठोस कृती आवश्यक युद्धाचे पडसाद स्थानिक पातळीवर कसे उमटतात याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वितरण व्यवस्थेतील अडचणी यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे अधिक कठीण होत असल्याचे चित्र आहे. सरकारकडून इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असल्याने नेमकी परिस्थिती काय आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणीही जोर धरत आहे.