Vidhan Parishad Election 2026 : शेवटच्या तासात अर्ज मागे घेत उद्धव ठाकरेंना दिला मोठा धक्का; ‘या’ उमेदवाराची पक्षातून तात्काळ हकालपट्टी
Vidhan Parishad Election 2026 , bal mane, thackeray shivsena, maharashtra politics

Maharashtra Politics : राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली आहे.
कोकण मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळ माने निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या काही तासांपूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री नितेश राणे आणि बाळ माने हे एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर माने उमेदवारी मागे घेणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आणि काही वेळातच त्यांनी अर्ज मागे घेतल्याची अधिकृत घोषणा झाली.
संजय राऊत यांची घोषणा – (Vidhan Parishad Election 2026)
शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून बाळ माने यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजपमधून ठाकरे गटात आले होते – (Vidhan Parishad Election 2026)
बाळ माने हे मूळचे भाजपचे नेते होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

Vidhan Parishad Election 2026 : शेवटच्या तासात अर्ज मागे घेत उद्धव ठाकरेंना दिला मोठा धक्का; ‘या’ उमेदवाराची पक्षातून तात्काळ हकालपट्टी
यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र, मतदानापूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने कोकणातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. महायुतीने ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.





