मुंबई – महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं घराणं असलेल्या पवार कुटुंबातील वादावर पहिल्यांदाच एका पुस्तकातून ओझरता प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात पक्षावरील नियंत्रणावरून वाद नसला तरी सारं काही अलबेल नसल्याचेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे पवार घराण्यात “ऑल इज नॉट वेल’ अशी चर्चा आता रंगत आहे.
“पॉवर ट्रेडिंग’ असे या पुस्तकाचे नाव आहे. प्रियम गांधी यांनी हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. प्रियम गांधी या राजकीय विश्लेषक आणि मीडिया सललागार आहेत. पक्षावरील नियंत्रणावरून आमदार रोहित पवारांना बळ दिले जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना डावलले जात असल्याचा धक्कादायक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे.
तसेच 23 नोव्हेंबर 2019 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्यावेळी सत्ता स्थापन केली होती. यावेळी पडद्यामागे काय हालचाली झाल्या होत्या?, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या कशा बैठका झाल्या?, शरद पवारांचा भाजपसोबत जाण्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याकडे कल का होता? अजित पवारांचा शिवसेनेसोबत जाण्याला का विरोध होता?,
अजितदादांनी फडणवीसांशी सूत का जुळवून घेतले?, अजितदादा-सुप्रिया सुळे यांच्या दरम्यानचे शीतयुद्ध आणि रोहित पवारांना दिले जाणारे बळ आणि पार्थ पवारांना डावलले जाणे आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र, एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवाल्यावरून या पुस्तकात ही माहिती दिली असली तरी या पुस्तकात माहिती देणाऱ्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
पहाटेच्या शपथविधीचाही उलगडा…
मागील वर्षी पहाटे शपथविधी घेऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा हादरा दिला होता. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असताना हा प्रयोग नेमका झालाच कसा, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण, अखेर या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण घडामोड समोर आली आहे. पहाटे झालेल्या या शपथविधी सोहळ्याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेत्याची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली होती. अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बैठक होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही बैठक पार पडली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हा फडणवीस यांच्या कार्यालयात जातो आणि पवारांनी आपली भूमिका बदली आहे, असा निरोप देतो. या निरोपाचा असा अर्थ होता की, “राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार होती.
पण ही शक्यता पूर्ण धूसर झाली आहे. निवडणुकीचा अनुभव पाहता पवारांनी आपला पक्ष आणि प्रतिष्ठा जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला कॉंग्रेसही पाठिंबा देण्यास उत्सुक आहे, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.