कोल्हापूर – महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोगनोळी टोल नाक्यावर अडवले जात आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव आहे त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय अन्यथा प्रवाश्यांना अडवलं जातंय . या घटनेबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चांगलेच भडकले आहेत.
कर्नाटक सरकारनं rt-pcr टेस्ट करण्याची जबाबदारी स्वतः घेणे गरजेचे आहे. दुसऱ्यांवर सर्व जबाबदारी लादन योग्य नाही. कर्नाटक सरकारनं स्वतः काहीतरी करावं… प्रवश्याना बंदी घालणं हे योग्य नाही…मग आम्हालाही उद्या बंदी घालावी लागेल असा सज्जड इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, केंद्र सरकारने या प्रकाराबाबत हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. कर्नाटकला प्रवाशांना आत घ्यायचं असेल तर तुम्ही आधी rt-pcr टेस्ट करून घ्या असं सांगण्यात आला आहे. सगळी जबाबदारी महाराष्ट्रावर ढकलून चालणार नाही. तुम्ही तुमची यंत्रणा वापरून rt-pcr टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मुंबई विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाची rt-pcr टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन केलं ती जबाबदारी महाराष्ट्राने घेतली त्याच पद्धतीने आता कर्नाटक सरकारने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान बंदी घालण्याचा प्रकार योग्य नाही याबाबत आपण महाराष्ट्र सरकारच्या सचिवांशी बोलून कर्नाटक सरकारच्या सचिवांना ही घटना सांगण्यात बाबत सूचना करू असे त्यांनी म्हटले आहे.