पालघर : महायुतीची डोकेदुखी वाढली; श्रीनिवास वनगांनंतर आता अपक्ष उमेदवार 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’

पालघर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यावेळी पालघर विधानसभा मतदारसंघ (Palghar vidhansabha election 2024) राज्यभर चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा तिकीट न दिल्यामुळे चार दिवस बेपत्ता झाले होते. आता पालघरमध्येच आणखी एक उमेदवार मागील 24 तासांपासून बेपत्ता आहे. माजी आमदार अमित घोडा बेपत्ता आहेत.
अमित घोडा यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते गेल्या 24 तासापासून नॉट रीचेबल झाले आहेत, त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
अमित घोडा अर्ज कायम ठेवणार?
अमित घोडा सध्या नॉट रिचेबल असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्या दिवसापर्यंत अमित घोडा यांनी माघार न घेतल्यास पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल. महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जयेंद्र दुबळा निवडणूक लढवत आहेत. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली होती. आता, वनगांच्यानंतर अमित घोडा यांची समजूत कशा प्रकारे काढली जाणार हे पाहावं लागेल.
प्रचाराचा जोर वाढणार –
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं 4 नोव्हेंबरची तारीख महत्त्वाची आहे. त्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील. यानंतर 5 नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एका टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

