रायगड – करोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशिर्वाद यात्रा नाही तर ती जनअपमान यात्रा असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. ते अलिबाग येथे बोलत होते.
भाजपने शुक्रवारपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. तर भाजपच्या या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. 21 ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची पोलखोल करत आहेत. आज जनआशिर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीने अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली.
मोदींचे सरकार आल्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही घडले नाही. आता जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येते आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांचा अपमान करण्याचे काम हे भाजपवाले करत आहे, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला. करोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने झाली.
त्यानंतर बंगालच्या निवडणूकीवेळी दुसरी लाट आली आणि आता जनआशिर्वाद यात्रा काढून तिसऱ्या लाटेला भाजप आमंत्रण देत आहे, असा टोला तपासे यांनी लगावला. जे काम केलेच नाही ते सांगायचे आणि राजकारणाची भाकरी भाजायची ही पध्दत भाजप वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केला