Newasa News : ज्ञानेश्वरी घाटात दिंडीतील लाखो वारकऱ्यांच्या हाताने बीजरोपण!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानेश्वरी घाटात (Newasa News) आगमन होताच, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 'ग्रीन सिटी मोहीम'च्या वतीने वारकऱ्यांसाठी एक अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

Newasa News : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानेश्वरी घाटात (Newasa News) आगमन होताच, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘ग्रीन सिटी मोहीम’च्या वतीने वारकऱ्यांसाठी एक अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना सुमारे १ हजार बियांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.
इमामपूर घाटाचे ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात ‘इमामपूर घाटाचे’ अधिकृतपणे ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले. हा नामकरण सोहळा (Newasa News) आणि बीज वितरण उपक्रम विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर मंदिराचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, देविदास महाराज म्हस्के, युवा नेते उदयन गडाख आणि डॉ. निवेदिता गडाख प्रामुख्याने उपस्थित होते.
वारकऱ्यांनी पेरली हिरवाईची बीजे
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घाट चढत असताना वारकऱ्यांनी मिळालेल्या पाकिटांमधील बिया रस्त्याच्या दुतर्फा टाकून निसर्गाची अनोखी सेवा केली. वारकऱ्यांच्या या पर्यावरण पूरक कृतीमुळे आगामी पावसाळ्यात हा संपूर्ण घाट हिरवागार होण्यास मोठी मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांचे आणि ‘ग्रीन आर्मी’चे मोलाचे सहकार्य
या संपूर्ण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी (Newasa News) प्रहार करिअर अकॅडमीचे संतोष पवार आणि विनोदसिंह परदेशी यांच्यासह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी उद्योजक सुरेश शेटे, बद्रीनाथ खंडागळे व परिसरातील असंख्य भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, ग्रीन आर्मी समितीचे सदस्य प्रा. हर्षल आगळे, इंजिनियर ॲड. कैलास दिघे, एकनाथ कौसे, विजया आगळे आणि ऋषिकेश कौसे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
वारीच्या या पवित्र काळात ज्ञानेश्वरी घाटाचे नामकरण आणि बीजरोपण असा हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आहे. वारकऱ्यांच्या हाताने पेरलेली ही बीजे केवळ वृक्ष नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी ऑक्सिजनचे कारखाने ठरणार आहेत.
– प्रा. हर्षल आगळे (सदस्य, ग्रीन आर्मी समिती)






