Newasa News : नेवाशात उबाठा शिवसेनेला मोठा सुरुंग; ‘चांडाळ चौकडी’वर निशाणा साधत शहरप्रमुखांसह तिघांचा राजीनामा!
पक्षश्रेष्ठींच्या अवतीभोवती असलेल्या ‘चांडाळ चौकडी’मुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणेही निष्ठावान शिवसैनिकांसाठी (Newasa News) दुरापास्त झाले आहे.

Newasa News : पक्षश्रेष्ठींच्या अवतीभोवती असलेल्या ‘चांडाळ चौकडी’मुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणेही निष्ठावान शिवसैनिकांसाठी (Newasa News) दुरापास्त झाले आहे. वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्याऐवजी तो कमजोर करत आहेत, असा घणाघाती आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २३) आपल्या पदांचे एकत्रित राजीनामे दिले. नेवाशात आयोजित पत्रकार परिषदेत सेना नेतृत्वावर जोरदार आगपाखड करत त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये (Newasa News) उबाठा सेनेचे नेवासे शहरप्रमुख नितीन जगताप, युवा आघाडीचे जिल्हाप्रमुख नीरज नांगरे आणि युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर शिंदे यांचा समावेश आहे. शहरात कट्टर निष्ठावान समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे नेवाशात राजकीय खळबळ उडाली आहे.
‘मातोश्री’वरून एबी फॉर्म नाकारला: नितीन जगताप
पत्रकार परिषदेत बोलताना नितीन जगताप यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, “मी वयाच्या १७ व्या वर्षापासून सलग २०-२५ वर्षे शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. धर्मवीर स्व. आण्णाभाऊ लष्करे यांच्या भक्कम साथीमुळे २००७ मध्ये नेवासे पंचायत समितीवर सर्वप्रथम भगवा फडकला. नेवासे शहरात पाच वर्षे उपसरपंचपद शिवसेनेकडे होते. पक्षवाढीसाठी आम्ही अंगावर केसेस, गुन्हे, जेल आणि मानसिक त्रास सहन केला.”
नगरपंचायत निवडणुकीतील प्रसंगाचा उल्लेख करताना जगताप म्हणाले, “नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आम्ही पक्षाचा पॅनल तयार केला होता. नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मी स्वतः मुंबईला ‘मातोश्री’वर पक्षाचा ‘एबी फॉर्म’ आणण्यासाठी गेलो होतो. मात्र, पक्षसचिव विनायक राऊत यांनी मला एबी फॉर्म देण्यास थेट नकार दिला आणि मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर माझे म्हणणे मांडूही दिले नाही.”
गडाखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि वरिष्ठ नेत्यांवर निशाणा
नितीन जगताप यांनी स्पष्ट केले की, एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली आणि मशाल चिन्ह न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
ते पुढे म्हणाले, “माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर न लढवता आपल्या ‘क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या’ चिन्हावर लढवली. त्यांनी जर मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवली असती, तर पक्षाचा आदेश मानून मी माझी अपक्ष उमेदवारी मागे घेतली असती.
४-५ वर्षांपूर्वी पक्ष फुटला, आमदार-खासदार सोडून गेले, तरीही आम्ही पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. परंतु, त्याचे हेच फळ आम्हाला मिळणार असेल तर काय उपयोग?” अशी टीका त्यांनी केली.
“उद्धव साहेबांबद्दल आदर, पण खालचे नेते पक्षाचे वाटोळे करत आहेत”
आपली खंत व्यक्त करताना जगताप म्हणाले, “आम्ही उद्धव साहेबांचा कालही आदर करत होतो आणि आजही करतो. मात्र, खालची वरिष्ठ नेतेमंडळी पक्षाचे वाटोळे करत आहेत. नगरपंचायत निवडणूक होऊन ७ महिने झाले तरी पक्षाने साधी विचारपूसही केली नाही. पक्षालाच जर कार्यकर्त्यांचे काही देणेघेणे नसेल, तर शिवसेनेत राहून काय फायदा?” याच कारणास्तव उबाठा सेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर करत तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.






