नेवासा : धनगर समाजाचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव, गुन्हेही दाखल; आंदोलक प्रल्हाद सोरमारे यांचा आरोप

नेवासा – धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी नेवासा फाटा येथे धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा आज शनिवारी (दि.२८) अकरावा दिवस आहे. मात्र शासकिय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.
आंदोलन हाणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपोषणकर्त्या आंदोलकांवर नेवासा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३५३ सह वेगवेगळे गुन्हे आंदोलकांवर दाखल केले असल्याचे बोलले जात आहे. आंदोलकांवर नेमके कोणते गुन्हे दाखल केले? याबाबतची कुठलीही माहिती नेवासा पोलीसांकडून दिली जात नाही. धनगर समाजाचे सुरु असलेले हे आंदोलन मागे घेतल्यानंतर नेवासा पोलीस प्रशासन उपोषणार्थी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा नवा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप धनगर समाजाचे नेते उपोषणार्थी प्रल्हाद सोरमारे यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना केला आहे.
धनगर समाजाचे नेते प्रल्हाद सोरमारे म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीसाठी नेवासा फाटा येथे राज्यव्यापी आंदोलन सुरुच असून या अमरण उपोषणाला राज्यातील समाजाकडून मोठा पाठींबा मिळत आहे, त्यामुळे आमचे हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस प्रशासन या उपोषणार्थीं आंदोलकांना धमकाविण्याचा प्रकार करत आहे, याला जबाबदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला.
सोरमारे म्हणाले की, नेवासा पोलीसांनी उपोषणार्थींवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केलेले असून याची साधी माहीतीही नेवासा पोलीस आंदोलकांना देत नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासन हे आंदोलन हाणून पाडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा डाव आखत आहे. पोलीसांनी हा प्रकार केल्यास राज्यात मोठे आंदोलन भडकणार असल्याचेही सोरमारे यांनी सांगितले.
नेवासा फाटा येथे सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनादरम्यान, दोन आंदोलनकर्त्यांनी प्रवरासंगम येथील गोदापात्रात उड्या घेतल्या होत्या. त्यामुळे या आंदोलकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर मोठी कसरत केली होती, हे आंदोलकही जीवंत ताब्यात घेतले. त्यानंतर या आंदोलकांनी औषधोपचार घेण्यासही नाकार दिला. धनगर समाजाचे नेते आंदोलक सोरमारे यांनी पाणी पिण्याचाही आता त्याग केला आहे. या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.





