Nevasa News: नेवासा तालुक्यात खासगी मालमत्ता हडपण्याचा संघटित व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून सामान्य मालमत्ताधारक भरडला जात आहे. महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही टोळ्या पद्धतशीरपणे इतरांच्या जमिनी बळकावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या टोळ्यांनी तालुक्यात मजबूत पाय रोवले असून न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न पीडितांसमोर उभा राहिला आहे. अशी असते टोळीची रचना – या टोळीचा म्होरक्या हा एखाद्या गावचा पाटील, सरपंच, पतसंस्थेचा मालक किंवा एखाद्या पुढाऱ्याचा विश्वासू माणूस असतो. त्याच्या हाताखाली महसूल विभागातील फुटकळ कर्मचारी, अॅट्रॉसिटीचा धाक दाखवणारे कार्यकर्ते, एक-दोन माफिया, आर्थिक पुरवठा करणारे सावकार, कोर्ट-कचेरी सांभाळणारे वकील आणि कायदा-सुव्यवस्था हाताळणारे चमचे अशी ही सुसज्ज टोळी असते. असा रचला जातो डाव – ज्या मालमत्तांमध्ये कब्जदारी, कुळ कायद्याचे वाद किंवा कागदोपत्री त्रुटी आहेत, अशा जमिनी या टोळ्या आधी हेरतात. त्यानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी महसूल व भूमिअभिलेख विभागातील कर्मचारी कामाला लावले जातात. या टोळ्यांच्या करामती इतक्या टोकाच्या असतात की मृत व्यक्ती कागदावर जिवंत होतात आणि जिवंत व्यक्तींना कागदोपत्री मृत दाखवले जाते. एका व्यक्तीच्या जागी दुसऱ्याचे नाव घुसवले जाते. बनावट नोटरी आणि खोटे दस्त तयार करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचाही वापर केला जातो. हेही वाचा – भिवंडीत 84 LPG सिलिंडर जप्त; दोन टेम्पो चालक ताब्यात, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल पीडिताला कोंडीत पकडण्याची खेळी – मूळ मालकाचे नाव उडवून मालमत्तेचे व्यवहार बेमालूमपणे केले जातात. मूळ मालकाला महसूल, कागदपत्रे आणि न्यायालयाच्या गुंत्यात असे अडकवले जाते की सत्य बाजूने असूनही तो पूर्णपणे वैतागून जातो. त्याचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण केले जाते. पोलिसांकडे दाद मागायला गेल्यास ते “हे सिव्हील मॅटर आहे” असे सांगून अंग काढून घेतात. न्यायालयात गेल्यास वर्षानुवर्षे खटला चालतो. अखेरीस हतबल झालेला मालक याच टोळीच्या एजंटला शरण जाऊन आपली मालमत्ता पडेल भावात विकून टाकतो. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी – बनावट कागदपत्रे तयार करणारे दलाल, त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि पोलिसांची निष्क्रिय भूमिका यामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या टोळ्यांना आळा घालावा, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या लुटारू टोळ्यांचा धुमाकूळ असाच सुरू राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.