NEET-UG paper leak: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मंगळवारी राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)चे महासंचालक अभिषेक सिंह यांना पदावरून हटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. सपकळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नीट परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आघात झाला असून, मोठ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. नीट (यूजी) २०२६ परीक्षा ३ मे रोजी देशभरातील ५५१ शहरांसह परदेशातील १४ शहरांत घेण्यात आली होती. सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने मंगळवारी परीक्षा रद्द करत संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या कार्यकाळात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची ही दुसरी घटना असल्याचे नमूद करत, २०२४ मधील वादानंतर करण्यात आलेली कारवाई दोषींना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही सपकळ यांनी केला. पुन्हा परीक्षा घेतल्यास देशभरातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील दौंड येथे नुकत्याच झालेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांचाही त्यांनी उल्लेख केला. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना भाजप सरकारचे संरक्षण मिळत असल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत, विद्यार्थी आणि पालक सरकारला माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “भाजप सत्तेत आल्यापासून एमपीएससीपासून नीटपर्यंत अनेक परीक्षांचे पेपर फुटले. आरोपींना अटक होते, त्यांनी किती पैसे कमावले हे सांगितले जाते; मात्र विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच होते,” अशी टीका केली.