लखनौ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत बोलताना ही बदलाची सुरुवात असल्याचा दावा केला. यावेळी पवारांनी भाजपवर निशाणा साधताना, “भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकद झोकून देत प्रचार केला. एवढंच काय तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देखील जोर लावला. मात्र तरी देखील भाजपच्या पदरी अपयशच आलं.” अशी टीका केली.
दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यासाठी उत्तर प्रदेशात आलेल्या पवारांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलाची नांदी असल्याचं सांगत योगी आदित्यनाथ यांनाही टीकेचं धनी केलं. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजप शासित इतर राज्यांचे मुख्यमंत्री दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात उतरले होते मात्र दिल्लीच्या जनतेने बदलाची सुरुवात झाल्याचा निकाल दिला.”
“सत्तेत असणारे सामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित करत आहेत. उत्तर प्रदेशाने देशाला अनेक बडे नेते दिले असल्याने उत्तर प्रदेशाचे देशाच्या राजकारणामध्ये अग्रणी स्थान आहे. या राज्यातील जनतेकडे देशाला योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे.” असं विधान करत शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील पक्षाचं संघटन मजबूत करणार असल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन उत्तर प्रदेश
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी, राज्यातील सपा-बसपाने लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याने भाजपला सत्ता मिळवण्यात यश आल्याचं सांगितलं. राज्यातील जिल्हा व गाव पातळीवर संघटन उभारणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत मतभेद नसल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.