हिंगोली – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली. जयंत पाटील हे 18 सप्टेंबरपासून मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्हा कार्यकारणी व विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला ते हजेरी लावणार आहेत.
70 प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हिंगोली येथील शिवलीला पॅलेसमध्ये त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा भाजपने घाट रचला आहे. निवडणूक आयोगावर कोणाचा प्रभाव नसेल तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेकडेच राहील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
भाजपला रोखणे गरजेच –
काँग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढायची असेल तर आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही, मात्र प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र लढून भाजपाला रोखण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र ते सहभागी झाले नाही आणि इतर पक्ष सोबत येत असतील तर त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवू.
प्रकल्प शिंदे-फडणवीस मुळे गेला –
जयंत पाटील म्हणाले, राज्यात सुमारे पाच लाख बेरोजगारांना काम देणारा प्रकल्प बाहेर राज्यात गेला. याला शिंदे सरकार जबाबदार आहे. महाविकास आघाडीने मोठे प्रयत्न करून हा प्रकल्प राज्यात आणला होता, मात्र शिंदे सरकारच्या दुर्लक्ष आणि हा प्रकल्प इतर राज्यात गेला. त्यानंतरही त्यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शिंदे सरकार दिल्लीला घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात राज्यभरात आंदोलन केले जाईल.
चित्त्यांवरून भाजपवर साधला निशाणा –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतात आणलेल्या चित्त्यांवरूनही जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, परदेशातून आणलेल्या चित्त्यांसाठी जंगलात जिवंत काळवीट सोडणे हा क्रूरपणा आहे. त्याऐवजी प्राणी संग्रहालयात ज्या पद्धतीने वाघ व इतर प्राण्यांना खाद्य दिले जाते, त्यापद्धतीने या चित्यांना खाद्य दिले गेले पाहिजे. जयंत पाटील यांच्यासोबत आमदार राजेश नवघरे, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.