Nasrapur News: २५ गावांचा संपर्क लोकसहभागातून जोडला! स्वखर्चातून पुलाचे काम पूर्ण; प्रशासन निद्रिस्त

प्रभात वृत्तसेवा
नसरापूर – मागील वर्षी (दि.२०) डिसेंबर रोजी गुंजवणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राजगड-वेल्हे परिसरातील २५ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता.अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेतील विलंब आणि उदासीनता ठळकपणे दिसून आली.
परिसरातील गावकऱ्यांनी लोकसहभागातून स्वखर्चातून पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुन्हा संपर्क पूर्वपदावर आले आहे.गुंजवणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राजगड-वेल्हे परिसरातील २५ गावांतील दळणवळण ठप्प झाले, रुग्णवाहिकांचा मार्ग बंद पडला. विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले, तर व्यापारी व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
अखेर प्रशासन थांबले, पण गावकरी न थांबता कार्यरत राहिले. परिसरातील तरुणांनी पुढाकार घेत लोकवर्गणी व स्वखर्चाच्या माध्यमातून पर्यायी पूल व रस्ता उभारला. पंचवीस गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा सुरू केला. मोरी, दगड, माती व मुरूम टाकून हा मार्ग रहदारीसाठी सुरक्षित केला आहे. हा रस्ता दोन्ही तालुक्यांना जोडणारा, व्यापार, पर्यटन व आपत्कालीन सेवांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो.
संपूर्ण घटनेत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे भावी नेते, लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणारे दावे करणारे अनेक चेहरे मात्र लवकरात लवकर लक्ष देताना दिसले नाहीत. पूल कोसळून कित्येक दिवस उलटूनही ठोस हस्तक्षेप न झाल्याने जनतेत नाराजी वाढली असून, या नेतृत्वाकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलत आहे. आपत्तीच्या वेळी जे सोबत उभे राहत नाहीत, त्यांना मताच्या वेळी जनता कशी पाहील ?असा प्रश्न आता उघडपणे चर्चेत आहे.
लोकशक्तीचा आदर्श, प्रशासनास थेट सवाल
या पर्यायी पुलामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. प्रत्येक पावसाळ्यात धोका पुन्हा उभा राहू शकतो. त्यामुळे कौतुकाचे शब्द नकोत-कायमस्वरूपी पूल हवा, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे. आज तरुणांनी स्वखर्चातून माणुसकीचा पूल उभा केला. उद्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदारीचा पूल उभारणार का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.
उपस्थिती व मार्गदर्शन
या लोकाभिमुख उपक्रमावेळी राजगडचे तहसीलदार निवास ढाणे आणि वेल्हेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य केले. आरसीसी मोरीसाठी प्रकाश वाढे यांचे मोलाचे योगदान लाभले.
संकल्पना व पुढाकार
या कामासाठी आसकवाडीचे सरपंच भाऊसाहेब दसवडकर, सुमित शिळीमकर (कोदवडी), टिल्लू वालगुडे (मार्गसनी) यांच्यासह अनेक तरुणांनी पुढाकार घेतला.
लोकवर्गणी, देणगीदार व यंत्रसामग्री
या उपक्रमासाठी मंत्रा रिसॉर्ट, अतुल हिवाळे, दिनकर घरपाळे, तानाजी बाप्पू मांगडे, संतोष रेणुसे, दिगंबर चोरघे, सतीश चव्हाण, दत्ता पानसरे, मुकुंद दंडवते, कुंभारकर, तनपुरे, राठोड, इंगूळकर, शिंदे, कुलकर्णी, रायकर, वर्धवन यांनी आर्थिक सहकार्य केले.
तर शिवाजी चोरघे यांनी आपला JCB/डंपर -२ दिवस, गणेश आलगुडे, मनोज शिळीमकर,अशोक सरपाले आणि पप्पू जगताप डंपर – १ दिवस, निखिल मराठे JCB – १ दिवस, टिल्लू वालगुडे JCB – ४ दिवस, महिंद्र दसवडकर डंपर – २ दिवस यांनी विनामूल्य यंत्रसामग्री दिली.





