Nashik News: नाशिककर खड्ड्याने त्रस्त, ठाकरेंची शिवसेना थेट रस्त्यावर; जनआक्रोश मोर्चादरम्यान प्रशासनावर रोष व्यक्त
Nashik News: महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - संजय राऊत

Nashik News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खड्ड्यांच्या प्रश्नावरून आज नाशिक महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून, महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला आहे. यावेळी शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले.
कारवाई करण्याची मागणी
नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या मोर्चाच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या सात नागरिकांचे फोटो लावण्यात आले आहेत. या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.
खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे.
महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संजय राऊत
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “तसेच हे अपघात नाही तर खून असून यासाठी महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे आंदोलन संपल्यावर जर खड्डे बुजवले नाहीत तर ज्या ज्या भागात खड्डे आहेत तिथल्या भाजपच्या नगरसेवकाच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत,” असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, “सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे पाहिले जाते. आज जो प्रश्न नाशिककरांना भेडसावत आहे त्यासाठीच शिवसेना पुन्हा लढत आहे. विकासाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, परंतु कोणत्या पद्धतीने हा विकास व्हावा यासाठीच या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून मार्ग निघावा आणि प्रशासनाने लक्ष द्यावे, यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे.” Nashik News
दरम्यान, या मोर्च्यात प्रतीकात्मक यमराज आणि रेडा आणून खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कुंभमेळ्याची कामे सुरू असतानाही शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. Nashik News
हेही वाचा:






