मुख्यमंत्र्यांचं शहर देशात पहिल्या क्रमांकावर; पण ‘या’ लाजिरवाण्या बाबतीत… NCRBच्या अहवालात वास्तव उघड

नागपूर : राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेले नागपूर शहर ‘टायगर कॅपिटल’ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र, याच शहराने आता एका लाजिरवाण्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या अहवालानुसार, सार्वजनिक ठिकाणी महिलांविरुद्ध अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ आणि अश्लील कृत्यांच्या गुन्ह्यांमध्ये नागपूर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. ही बाब शहराच्या प्रतिमेला काळीमा फासणारी ठरली आहे.
एनसीआरबी अहवालातून उघड झाले वास्तव –
एनसीआरबीच्या २०२३ च्या अहवालानुसार, नागपूर शहरात अश्लील कृत्ये, शेरेबाजी आणि द्विअर्थी गाणी यांसारख्या कृत्यांप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २९४ आणि आता भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २९६ अंतर्गत तब्बल ५५० हून अधिक गुन्हे नोंदवले गेले. यामुळे नागपूरने देशातील अन्य शहरांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील मध्य प्रदेशातील इंदूर शहरात यापेक्षा खूपच कमी गुन्हे नोंदले गेले. नागपूर आणि इंदूर यांच्यात तब्बल ४०० गुन्ह्यांचे अंतर आहे.
इतर शहरांची स्थिती –
एनसीआरबीच्या यादीत उत्तर प्रदेशातील कानपूर ९७ गुन्ह्यांसह तिसऱ्या, केरळमधील कोची ८५ गुन्ह्यांसह चौथ्या आणि कोझिकोड ५० गुन्ह्यांसह पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत या कलमांतर्गत केवळ ४८ गुन्हे नोंदले गेले. देशभरात २०२३ मध्ये या कलमांतर्गत एकूण १,०६३ गुन्हे दाखल झाले.
काय आहे कायदेशीर तरतूद?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये, शेरेबाजी किंवा द्विअर्थी गाणी म्हणणे हा गुन्हा ठरतो, परंतु यासाठी तक्रारदाराला त्रास झाल्याचे सिद्ध होणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात तक्रारदाराने लेखी तक्रार केल्यास आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यास, पोलिसांना कायदेशीर कारवाई करावी लागते. बीएनएसच्या कलम २९६ अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, या कलमांतर्गत १,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अशा गुन्ह्यांचे पुरावे सादर करणे आणि ते न्यायालयात सिद्ध करणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक असते.
नागपूरच्या प्रतिमेला धक्का –
मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरात अशा गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असणे ही चिंताजनक बाब आहे. यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूर पोलिसांनी यावर कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांद्वारे परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अहवालाने शहरातील सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकला असून, यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





