द्रुतगतीमुळे नगर- मनमाडचा रेल्वेप्रवास सुपरफास्ट

नगर – नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे.
गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी 13 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 94 कि.मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासन्तास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा संपूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रति कि.मी. वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे.
शनिवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पूर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी रेल्वे ताशी 125 वेगाने धावली.
बेलापूर ते पढेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, कार्यकारी अभियंता डी.पी.पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर.जे. गायकवाड, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार, आर.डी. सिंग, इजिनिअर सुद्धांसू कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल आदींसह एक्झिकेटीव इंजिनिअर उपस्थित होते.
मनमाड ते नगर डबल लाईन (द्रुतगती) रेल्वे मार्गाच्या सातव्या टप्प्याची चाचणी शनिवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढण्यात आला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.
– दीपक कुमार
उपमुख्य अभियंता, अहमदनगर





