Nagar: हिवरे बाजारमधील प्रशिक्षण केंद्रातून देशाच्या ग्रामविकासाला नवी दिशा

अहिल्यानगर : पाणलोट विकास व इतर विकासकामांत हिवरे बाजारने जे अव्वलस्थान राज्यात व देशात संपादन केले आहे.अशा गावात ग्रामविकास पाणलोट विकासाचे अद्यावत प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे .या प्रशिक्षण केंद्रातून राज्य व देशातील गावांचे सरपंच व कार्यकर्त्यांनी गावाचा कायाकल्प कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळणार आहे. शाश्वत ग्रामविकासाच्या नव्या प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील ग्रामविकासाला नवीन दिशा आणि चालना मिळणार असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी काढले.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे उभे राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामिण विकास प्रशिक्षण केंद्राची जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी पाहणी केली.आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांनी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती दिली.
प्रशिक्षण केंद्राच्या पाहणी केल्यावर बोलताना पाटील म्हणाले की, सन २००१ ते २००३ या काळात नगरला प्रातांधिकारी असताना हिवरे बाजारला अनेक वेळा भेटी दिल्या .आज जलसंधारण सचिव म्हणून हिवरे बाजारला येण्याचा योग आला. आजच्या भेटीत जुन्या आठवणीना उजाळा देता आला. पूर्वीच्या भेटीत हिवरे बाजारच्या सर्वागीण विकासाचे काम चालू होते.आता पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून हिवरे बाजारचा पूर्ण कायाकल्प केला आहे. सतत दीड तप गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकासात सातत्य ठेवणे खूप अवघड आहे.
परंतु पोपटराव पवार यांनी समर्पण भावनेने काम करून अवघड गोष्ट साध्य केली. विकासाची कामे सर्वत्र होतात परंतु सातत्याअभावी विकसित झालेली गावे पुन्हा मागे पडतात. पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पिकपद्धती म्हणूनच लोकसहभागातून हिवरे बाजारातील पाणलोट विकासासह सर्व प्रकारच्या विकासाचे प्रत्येक कामात तंत्रशुद्ध आणि पारदर्शकता आहे म्हणून कामे दीर्घकाळ टिकून आहेत. प्रयोगशाळेची पाहणी पाटील यांनी केली.
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष डॉ.पोपटराव पवार यांनी जलसंधारण सचिव गणेश पाटील यांचे स्वागत केले. प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक सहयोगाबद्दल आभार व धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, आदर्श गाव योजनेचे कृषी उपसंचालक वसंत बिनवडे, तालुका कृषी अधिकारी सुदर्शन वायसे , शास्त्रज्ञ सचिन नांदगुडे, नाम फौंडेशनचे संग्राम खलाटे व इतर अधिकारी उपस्थित होते.





