कोल्हापूर : नोटबंदीच्या काळातील नोटा आणि नाबार्डने चुकीच्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची अपात्र ठरविलेली कर्जमाफी या संदर्भात आपण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले. नोट बंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखाच्या नोटा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहेत, त्या नोटा रिझर्व बँकेने तातडीने बदलून द्यायला हव्यात, अशी मागणी मंत्री त्यांनी केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 86 व्या सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील, भाजप नेते अमल महाडिक, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय मंडलिक उपस्थित होते. हसन मुश्रीफ म्हणाले, इतकंच नव्हे तर नाबार्डने चुकीच्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी अपात्र ठरविली आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथं आपल्याला न्याय मिळाला पण नाबार्डने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेचे जवळपास दोन अडीच कोटी रुपये खर्च झाले आहेत, असेही त्यांनी बोलून दाखवले. हसन मुश्रीफ म्हणाले, तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ आहेत. अशा वक्तव्यामुळे महायुतीत गैरविश्वासाचे वातावरण तयार होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची गरज आहे. त्यांची अनेक अशी वक्तव्ये आहेत, निवडणुकीच्या तोंडावर आपल्याबद्दल वाईट संदेश जात असेल तर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.