मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून संबंधित निर्णय अनपेक्षित असल्याचे या प्रतिक्रियामध्ये सांगण्यात येत आहे.
आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातच आता कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. मी ज्यांना निष्ठावंत समजत होते. ते नेते डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे, असे विधान आमदार राजपूत यांनी केले. ते औरंगाबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उदयसिंह राजपूत आपल्या भाषणात म्हणाले, “माझं नाव उदयसिंह चित्रासरदारसिंह राजपूत आहे. पण माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आहे. त्यामुळे मी व्हीप संदर्भात उद्धव ठाकरे यांचाच आदेश पाळणार… बंडोखोरीच्या आधी मी आमदारांच्या रांगेत सगळ्यात मागे बसायचो. मला वाटायचं समोर बसलेले निष्ठावंत असतील. पण ते तर डुप्लिकेट निघाले,”या असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे बोलताना राजपूत यांनी ‘आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे. निष्ठावान हे काही कपाळावर लिहिलेलं नसतं. कारण पहिल्या दिवशी बाजुला बसलेले आमदार दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत दिसले. सध्या उद्धव ठाकरेंची खूप क्रेझ वाढली आहे. त्यामुळे जो उठतो तो उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करतो, असे मत आमदार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केले आहे.