मर्डर मिस्ट्री! लॉजमध्ये गेले होते चार मित्र, परतले मात्र तिघेच… दोन महिन्यांनंतरही खुनाचे गूढ कायम; तिघांना अटक

पुणे – चंदननगर पोलिसांना १५ मार्च रोजी एका लॉजवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह सडू लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल दोन महिने कसून तपास केला. तरुण ज्या रुममध्ये होता, त्या रुममध्ये त्याच्या तीन मित्रांव्यतिरीक्त इतर कोणीही गेले नसल्याचे सीसीटीव्हीवरुन स्पष्ट झाले होते. मात्र मित्रांकडे केलेल्या तपासात काहीही दुवा सापडत नव्हता.
तसेच मृताच्या घरच्यांचाही मित्रांवर विश्वास असल्याने त्यांनी तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला होता. सरतेशेवटी पोलिसांनी दोन महिनानंतर सरकारतर्फे तक्रार दाखल करत तिघाही मित्रांना जेरबंद केले. मात्र अद्यापही मित्रांनी खूनाची कबुली दिली नाही कि तपासात खूनाचे कारण उघड झाले नाही. यामुळे घटनेचे गुढ अद्यापही कायम आहे.
आकाश सुनिल साबळे (३०,रा.नागपाल रोड, चंदननगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी शशिकांत मच्छिंद्र घोरपडे(३४,रा. खुळेवाडी), रोहित आंनद मोरे (३२,रा.वडगाव शेरी) आणि यश रघुनाथ डांगे(२१,रा. केसनंद ) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना चंदननगरधील पठारेवस्तीतील हॉटेल ओयो स्टार येथे १४ मार्च रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शशिकांत हा महापालिकेच्या एका जलतरण तलावात काही महिने कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडून दिले होते. त्याला दारुचे व्यसन असल्याने अनेकदा तो आठ आठ दिवस घरी येत नव्हता. तो दारु पिण्यासाठी नियमीतपणे ओयो स्टार लॉज बुक करत होता. तेथे तो तीघा मित्रांना बोलावून घेत असे. मित्र ही नियमीतपणे बिर्याणी आणि दारु घेऊन त्याला भेटायला जात असत. दरम्यान धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी त्याने मित्रांना लॉजवर बोलावून घेतले होते. मित्र नेहमी प्रमाणे खाण्या पिण्याचे सामान घेऊन आले होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान ते आले होते. यानंतर एक एक करुन ते बाहेर पडले.
शेवटी जाणाऱ्याने नेहमीप्रमाणे रुमची बाहेरुन कडी लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचे कर्मचाऱ्यांनी कडी वाजवून बघीतली. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. नशा उतरली नसल्याने कदाचीत आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे समजून ते निघुन जातात. परत ते दुपारी बारा वाजता कडी वाजवतात तरीही प्रतिसाद मिळत नाही. यामुळे ते जवळच्या रहाणाऱ्या त्याच्या एका मित्राला बोलावून घेतात.
त्याच्या समक्ष दुपारी अडीच वाजता रुमची कडी खोलून ते आत जातात. तेव्हा शशिकांतचे हात पाय कोरडे पडलेले तसेच तो कोणतीच हालचाल करत नसल्याचे आढळते. कर्मचारी तातडीने चंदननगर पोलिसांना खबर देतात. पोलिस घटनास्थळी दाखल होतात. मात्र तरुणाच्या अंगावर कोणत्याही गंभीर जखमा दिसत नाहीत. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जातो.
दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालात वैद्यकीय तज्ञ गळा दाबून खून केल्याची शक्यता वर्तवतात, तसेच गळ्यावर एक छोटे फ्रॅक्चर असल्याचेही सांगतात. यामुळे पोलिसांना तीघाही मित्रांवर संशय येतो. मात्र शशिकांतच्या घरच्यांचा मित्रांवर विश्वास असल्याने ते कोणतीही तक्रार देण्यास नकार देतात. दरम्यान पोलीसांनी सेलो टेपले त्याच्या गळ्यावरील नमुने घेऊन ते लॅबमध्ये तपासाला पाठवले. तेव्हा त्याच्या अहवालातही मानेवर काही सफेत पावडरसारखे फायबर कण आढळून आले. यामुळे शशिकांतचा खून झाल्याच्या दुष्टीने पोलिसांचा तपास सुरु होतो.
तब्बल दिड महिणा तपास ; पोलिसांची सो मोटो तक्रार-
पोलिसांनी तपास करताना लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा शशिकांत रुममध्ये गेल्यानंतर त्याचे तीन मित्र रुममध्ये गेल्याचे दिसले. ते एक एक करुन बाहेर येतानाही दिसले. दुसऱ्या दिवशी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच गेले नसल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.पोलिसांनी प्रत्येक सेकंदाचे फुटेज तपासले आहेत. या दरम्यान वीज गेल्याने फुटेज आले नाहीत असेही काही झालेले नाही. यामुळे तीघा मित्रांनीच खून केल्याचा एक प्राथमिक निष्कर्ष निघत होता.
त्यानूसार पोलिसांनी मित्रांना ताब्यात घेऊन तब्बल दिड महिणे चौकशीही केली. त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच शशिकांचे घरचेही मित्रांविरुध्द तक्रार देण्यास तयार झाले नाहीत. सर्व परिस्थिती पहाता पोलिसांनी स्वत:हून सो मोटो सरकारतर्फे तक्रार दाखल करुन आरोपींना मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
“आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून अद्यापही ते तपासला प्रतिसाद देत नाहीत. मात्र सर्व परिस्थिती आणि पुरावे बघता मित्रांनीच खून केल्याचे निष्पन्न होत आहे. बेडशीट किंवा एखाद्या मऊ कापडाने गळा आवळून खून केल्याची शक्यता दिसत आहे.” — सीमा ढाकणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर)
शशिकांतची एका ठिकाणी काही जणांची बाचाबाची झाली होती. तेव्हा एकाने त्याची गचांडी पकडली होती. मात्र यानंतर तो हॉटेलवर चालत गेला. त्यानंतर मित्रांना बोलावून मद्यपान केले. यामुळे गचांडी धरणाऱ्यावरही पोलिसांचा संशय होता. मात्र वैद्यकीय तज्ञांनी सांगितले की त्याचा मृत्यू गळा दाबल्या दाबल्या झाला आहे, इतक्या वेळ तो जीवंत राहू शकला नसता. यामुळे पुन्हा संशयाची सुई मित्रांकडेच वळली.





