Mulshi Heavy Rain: मुळशी धरण परिसरात धुवाधार पाऊस! ताम्हिणी, बारपे, वळणे येथे दरडी कोसळल्या; जनजीवन विस्कळीत
Mulshi Heavy Rain: सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरउतारांवरून माती आणि राडारोडा रस्त्यावर; बारपे परिसरात डोंगराचा भाग कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान.

Mulshi Heavy Rain – मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिल्याने धरण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताम्हिणी घाट, बारपे, वळणे तसेच इतर डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले असून, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताम्हिणी घाट परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती,
दगड आणि राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरउतारांवरून अद्यापही माती व दगड घसरत असल्याने परिस्थिती धोकादायक बनली आहे. बारपे परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळून माती व दगड खालील शेतजमिनीत वाहून आल्याने अनेक शेतजमिनी सपाट झाल्या असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वळणे परिसरातही दरड रस्त्यावर कोसळली होती. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तातडीने मोकळा करण्यात आला.
नानिवली गावातही मुसळधार पावसामुळे जमीन खचल्याने एका कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच धरण परिसरातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पाणीपुरवठा, दळणवळण आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर आलेली दरड हटविण्यासाठी प्रशासनाने दोन जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने साफसफाईचे काम सुरू केले होते.
मात्र, काम सुरू असतानाच वरच्या बाजूने पुन्हा माती व दगड कोसळू लागल्याने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही जेसीबी मागे घेण्यात आल्या. त्यामुळे काही ठिकाणी साफसफाईचे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आणि वाहनचालकांनी ताम्हिणी घाट मार्गावर अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी केले आहे.
मदतकार्यात अडथळ्यांची भीती
धरण परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल धोकादायक होणे तसेच मोबाईल नेटवर्क विस्कळीत होणे यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास मदतकार्य पोहोचविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने धरण परिसरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.




