Mukesh Sahni । बिहारमधील दरभंगा येथे माजी मंत्री मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. वडील जीतन साहनी यांचा मृतदेह गावातील घरातच विकृत अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची स्थिती पाहता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याचे समजते.
मुकेश साहनी मुंबईहून परतत असून गावात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. असून एसआयटीची स्थापना करण्यात आली असून ती चौकशी करत आहे. यावरून राजकारणही तापले आहे. लालू यादव यांचा पक्ष आरजेडीने नितीश कुमार सरकारवर जंगलराजचा आरोप केला आहे. पप्पू यादव यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अशात आता भाजप नेते अजय आलोक यांनी एक अजब विधान केले आहे, ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या हत्याकांडावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही हल्लाच्या संदर्भही त्यांनी दिला आहे.
Mukesh Sahni । नेमकं काय म्हणाले अजय आलोक
‘सुसंस्कृत समाजात घटना थांबवता येत नाहीत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही हल्ला झाला होता. या जगात अमेरिकेपेक्षा मोठी महासत्ता नाही, तरीही ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. होय, त्यांनी कारवाई केली आणि हल्लेखोराला लगेच ठार केले. येथेही तातडीने कारवाई केली जाईल. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. त्यांच्याशिवाय जेडीयू नेते आणि केंद्रीय रामनाथ ठाकूर म्हणाले की, घटना घडतच असतात. मात्र त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये एकही गुन्हेगार सोडला जाणार नाही.’
या हत्याकांडामुळे नितीश कुमार सरकारवर आरोपांचा फेराही वाढला आहे, असे आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले,’बिहारमध्ये काय चालले आहे याची सर्वांनाच चिंता आहे. सरकार पूर्णपणे हतबल झाले आहे. राज्यकर्ते बेशुद्ध अवस्थेत आहे. काय झाले ते त्यांना कळणारही नाही. जेडीयू आणि भाजपच्या नेत्यांचीही रोज हत्या होत आहे. ही जंगलराजची परिस्थिती आहे. मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या ही काही सामान्य घटना नाही. एवढी मोठी घटना कशी घडली, याची चौकशी व्हायला हवी. बिहारची परिस्थिती अशी आहे की कोणी ऐकत नाही आणि राज्यकर्ते बेभान झाले आहेत. त्यामुळेच आपण म्हणतो की बिहारमध्ये बिनडोक सरकार आहे आणि परिस्थिती जंगलराजसारखी आहे.